पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्याला देण्याच्या दृष्टीने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने दिलेल्या प्रस्तावाचा जलसंपदा विभागाने पंधरा दिवसांच्या आत अभ्यास करुन अहवाल सादर करावा, असे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले.
पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी मराठवाड्याला मिळावे याबाबत जलसंपदामंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक झाली.
पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी मराठवाडा विभागात वळविण्याच्या अनुषंगाने गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाने केलेल्या सादरीकरणाचा संपूर्ण अभ्यास करून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे. जलसंपदा विभागाने महामंडळाच्या दिलेल्या प्रस्तावाचा विभागाने अभ्यास करुन अहवाल दिल्यानंतरच हा प्रकल्प सुरु करण्याबाबतची व्यवहार्यता कळण्यास मदत होणार आहे. विभागाने सविस्तर अहवाल दिल्यानंतर तात्काळ याविषयी बैठक घेण्यात येणार असल्याचेही जलसंपदामंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.
या बैठकीला सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, रोजगार हमी मंत्री संदिपानराव भुमरे, आरोग्य मंत्री राजेश टोपे, महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, पर्यावरण राज्यमंत्री संजय बनसोडे, आमदार सर्वश्री विनायक मेटे, धीरज देशमुख, संदीप क्षीरसागर, अमर राजूरकर, बाळासाहेब आजबे, सतीश चौधरी, अमरसिंह पंडित, माजी राज्यमंत्री प्रकाश सोळंके यांचेसह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.